Sunday 22 June 2014

नवीन 'बाप'

परंपरागत कुटुंबांचा ढाचा गेल्या दोन तीन दशकात बदललेला दिसून येतो. घटस्फोट, दुसरे लग्न, नवीन संसार आणि या संसारात वाढणारी, रमणारी मुले ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. 'सावत्र' आई ही चेटकीण किंवा अगदी दुर्गुणाची पुतळी नसते आणि आईच्या नवीन जोडीदाराला, 'काका' किंवा तत्सम उपाध्या न देता बाबा किंवा त्याच्या नावाने हाक मारणे आता रुजायला लागले आहे. समाजही अशा कुटुंबाकडे मोकळ्या नजरेने बघायला लागला आहे. खरे तर नवीन नाते किंवा कुटुंब हे सर्वांसाठी एकाच वेळा सुखकर अनुभव असतोच असे नाही. जुन्या तुटलेल्या नात्यांचे कडू अनुभव, मुलांच्या कस्टडी किंवा आठवड्याच्या भेटायच्या वेळा आणि इतर जबाबदाऱ्या यातून अनेक रूपाने आधीचे नाते नवीन कुटुंबात डोकावत असतेच. आपल्या साथीदाराला सांभाळून घेताना मुलांनाही त्या नात्यात सामावण्याची धडपड या नव्या कुटुंबात दिसते. नाती तुटण्याची अनेक कारणे असली तरी नव्या संबंधांकडे मात्र आता नवीन सुरुवात आणि ती जुन्या पेक्षा सरसच असणार अशा आशावादी दृष्टीकोनातून पाहिले जाते, तसे आवश्यकही आहे. पण खरे तर हे नवीन नाते अधिक क्लिष्ट, चढत्या रस्त्याचे आणि मानसिक दृष्ट्या कस लावणारे असते. कालांतराने थोडे स्थिरस्थावर झाले, अनेक स्वप्ने वास्तविकतेच्या पातळीवर स्वीकारली गेली तरी या नातेसंबधातील मुलांशी जूळणूक बरेच काळ चालणारी असते. खरे तर 'सामान्य' कुटुंबातही मुले जशी वाढत जातात तसे पालकही 'पालक' म्हणून वाढतच असतात. आणि जिथे असे जुळवून घेणे, एकत्र वाढणे होत नाही तिथे संघर्ष, कलह हे ही असतातच. परंतु दुसऱ्या लग्नातील नात्यांना मात्र 'वेगळेपणाचा', जैविक ( biological ) आई /बाप नसण्याचा एक वेगळा पैलू असतो, आणि तो कधी कधी फार धारदार पणे पुढे येतो किंवा आणला जातो.
बहुतांशी कुटुंबामध्ये मुले अजूनही आईच्या कस्टडीत दिली जातात. त्यामुळे नवीन संसारात बहुधा बाबा ही addition असते. एकूणच ज्या पद्धतीने संगोपन आपल्याकडे होते, पुरुषसत्ताक पद्धती असली तरी आईकडचा प्रभाव मुलांच्या संगोपनावर जास्त असतो. त्यात विभक्त कुटुंबात जेव्हाआई बाबा वेगळे होतात त्या प्रक्रियात मुले आईबरोबर त्या प्रक्रियेमध्ये ओढली जातात आणि बहुतांशी तिच्याकडेच राहतात. वडिलांना जरी न्यायालयांनी भेटण्याचे, मुलांच्या इतर जबाबदाऱ्यात समान हक्क दिले असले तरी, एकूणच विभक्त झाल्यावर आईचा, तिच्या कुटुंबाचा जास्त प्रभाव त्यांच्या वाढण्यावर असतो. बरेचसे बाबा त्यामुळे कितीही committed असले तरी त्यांच्या आपल्या मुलांवरच्या हक्कावर, प्रभावावर मर्यादा येतेच. याची दुसरी बाजू म्हणजे ज्या आया मुलांच्या कस्टडी घेतात त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते आणि एक स्त्री म्हणून त्या सर्व संयोजनातून जाताना तिला इतर अनेक घटकांचा सामना करावा लागतो. या विषयावर बरेच लिहिले गेले आहे
नवीन संसारातही जर मुले असतील तर त्यांची त्यांच्या आईशी अशीच जवळीक आणि आईवर अधिक जबाबदारी असते, त्यात आपल्या नवीन जोडीदाराला सामावून घेणे, नवीन नात्याची घडी बसवताना, मुलांना दुर्लक्षित वाटणार नाही अशा विवंचनेत ती असते. बाबावर मात्र नवीन मुलांना आपलेसे करून, त्यांच्यावर आपल्या मुलासारखे प्रेम करणे, त्यांच्या जबाबदाऱ्या उचलणे आणि स्वतःचे पती, पालक म्हणून स्थान निर्माण करणे असे आव्हान असते. कसे जुळवून घेतात हे नवीन बाप या परिस्थितीशी? मुळात त्यांनी आईशी लग्न केले म्हणून मुलांचे बाप बनावे अशी अपेक्षा ठेवणे संयुक्तिक आहे का ? का या नविन नात्यांना आपण परंपरागत कुटुंबाच्या ढाच्यात बसवू इच्छितो? बऱ्याच ठिकाणी आई आणि तिचा पार्टनर/ नवरा हे एक स्वतन्त्र नाते म्हणून बघतात, परंतु एकाच छताखाली जर सर्व राहणार असतील तर त्यांच्यातील नाते संबंध कसे असावेत? पालक बनताना biological घटक किती महत्वपूर्ण ठरावेत अशा नात्यात- दुसऱ्याच्या आपले मुल म्हणून स्वीकारणे, वाढवणे हे खरेच शक्य आहे का ? आधीच्या संसारातील अवशेष या ना त्या निमित्ताने पुन्हा पुन्हा नवीन नात्यात डोकावत असताना एका नात्याचे replacement म्हणून नवीन नाते बघावे का दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी ठेवून आहे तसा त्याचा स्वीकार करावा? कालांतराने आधीच्या नात्यात सर्वच वाईट नव्हते आणि आपल्याही चुका स्वीकारण्यास जेव्हा आपण तयार असतो, तेव्हा मित्रत्वाच्या नात्याने जुन्या सह्चराचा स्वीकार का करू नये - असे अनेक प्रश्न पुढे येताना दिसतात.
 या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हे लिखाण. माझा स्वतःचा संसार आणि मुले या अनुभवातून जात आहोत. कभी खुशी कभी गम असा प्रवास असला तरी तो फक्त त्यांचा biological बाप या प्रवासात नाही , म्हणून नाही. मुले वाढताना आणि वाढवताना येणारे विविध अनुभव आणि त्यावातिरिक्त आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा परिपाक हा प्रवास आहे. तुमचे अनुभव किंवा निरीक्षण काय आहे या बाबतीत, ऐकायला आवडेल.
मायबोलीवर संयुक्ता गटात लिहिलेले हे लिखाण. १० जून २०१४ ला प्रसिद्ध झाले होते व अनेकजणींनी यावर प्रतिसाद दिला होता. 

पेटेंटेड मराठी

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी. या ब्लॉगवर पण ही पोस्ट आहे. 
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. स्मित
ही पोस्ट मायबोलीवर १३ जून २०१४ ला प्रसिध्द झाली आहे. यावर आज दिनांक २२जून पर्यंत  ३०० पर्यंत प्रतिसाद आले होते -- अनेक लोकांनी आपले पेटंट इथे प्रसिद्ध केले आहेत. http://www.maayboli.com/node/49423

Tuesday 10 June 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास

सौदी अरेबिया, गल्फ देश-  संक्षिप्त इतिहास 

सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश.  अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांना एकत्रित करून १९३२ मध्ये सध्याच्या राजेशाहीची सुरुवात केली. हे चार भाग म्हणजे हेजाझ, नजद, पूर्वेचा अल-हसा आणि दक्षिणेकडील असीर. अब्दुलअझीझ  ने १९०२ साली रियाध काबीज करून खरे तर राजेशाही ची स्थापना केली होती. हेजाझ च्या भागातील तुरळक शहरी भाग वगळला तर हा भटक्या टोळ्यांचा प्रदेश. सातव्या शतकात प्रेषिताच्या मृत्युनंतर त्याच्या अनुयायांनी अरेबियाच्या पुढे जाउन मुस्लिम साम्राज्य वसवले तेव्हापासून मक्का व मदिना या ठिकानांना राजकीय व धार्मिक महत्व प्राप्त झाले. त्याआधीही मक्का व काबा तसे पूजनीय होतेच -पण इथल्या स्थानिक लोकांसाठी. जसे जसे मुस्लिम साम्राज्य वाढले तसे अरेबिया मागे पडला आणि नव्या राज्यकर्त्यांनी दुसरीकडे आपल्या राजधान्या वसवल्या. वार्षिक हजयात्रे शिवाय या भागात तसे काहीच स्वारस्य उरले नाही. १० व्या शतकापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत मक्केच्या शेरीफाकडे इथला स्थानिक कारभार आणि कैरो, इस्तंबूल किंवा बगदाद खिलाफातीशी त्याची निष्ठा अशी घडी ब्रिटीश येईपर्यंत कायम राहिली. सोळाव्या शतकात  पोर्तुगीजांच्या लाल समुद्रावरच्या आक्रमणाला शह देण्यासाठी ऑटोमन या भागात शिरकाव करून त्यांनी लाल समुद्र, पर्शियाचे आखात ( हेजाज, असीर आणि अल हसा ) हा भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला. पुढची चार शतके गरजेनुसार ऑटोमन साम्राज्याच्या सत्ता आणि  सामर्त्यानुसार त्यांची  या भागावर पकड कमी जास्त होत राहिली.  साधारण १७४४ च्या सुमारास नजद भागातल्या सौद या घराण्याने इथे आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले आणि त्याला मदत मिळाली ती अब्दुल अल वहाब या कर्मठ धर्मप्रचारकाची. सुन्नी हनाबली पंथाच्या अल वहाबने वहाबी विचारसरणीचा व या  पंथाचा जनक . सौद्ची राजेशाही आणि या विचारसरणीचा प्रसार प्रचार  अठराव्या शतकात अरेबिया पासून सुरु झाला . १७७४ साली रियाध येथे स्थापन झालेल्या या राजेशाहीने बघता बघता पूर्ण सौदी  अरेबियाचा आज दिसणारा भाग  काबीज केला. १८१८ साली ऑटोमन साम्राज्याने मुहम्मद अलीस  येथे पाठवून या वाढत्या साम्राज्याचा बीमोड केला. नजदच्या  भागात त्यानंतरच्या कालावधीत १८२४ साली पुन्हा या राजघराण्याने आपली छोटीशी राजेशाही स्थापन केली. यानंतर पुढचे दीड शतक अरेबियावरच्या सत्तेसाठी सौद व अल रशीद या दोन घराण्यांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले. १८९१ मध्ये अल रशीद ने सौद ला पराभूत केले त्यानंतर सौद कुटुंबास शेजारच्या कुवेतमध्ये आसरा घ्यावा लागला. १९०२ साली इब्न सौद ने रियाध पुन्हा ताब्यात घेतले व सौद कुटुंब परत नजदला आले. याच दरम्यान वहाबी शिकवणीने प्रेरित फैसल अल दाविश ने इथल्या टोळ्यांची मिळून इखवान ही संघटना बांधली होती. या संघटनेच्या मदतीने सौद ने १९१३ साली हसा चा भाग काबीज केला. याच दरम्यान मक्केच्या शेरीफ हुसेन ने ब्रिटीशांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याविरुध्ह उठाव केला होता. हा उठाव असफल झाला पण पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्यच कोसळले व ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडीत मात्र सौद ने मुळीच भाग घेतला नाही. तो रशीद घराण्याबरोबर त्याच्या लढाया लढत राहिला १९२१ मध्ये पूर्ण नजद आणि नंतर १९२४ - २५ च्या दरम्यान हेजाज चा प्रांत त्याने  जिंकून प्रथम २१ साली नजद चा सुलतान, २६ साली हेजाजचा राजा आणि नंतर ३२ साली सौदी अरेबियाचा राजा म्हणून  सौदने स्वतास घोषित केले -- हा सौदी अरेबियाचा अगदी धावता इतिहास 
 आपली सत्ता स्थिर केल्यावर बाह्य आक्रमणापासून संरक्षणासाठी सौदीने ब्रिटिशांचे संरक्षित क्षेत्र म्हणून  आपला दर्जा मान्य केला व तसा करार ब्रिटिशाबरोबर केला.  या सर्व काळात या प्रदेशांतील आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. पूर्व किनाऱ्यावर  होणारी मोत्यासाठीची मासेमारी, व्यापारातून येणारा तुटपुंजा पैसा  आणि तीर्थयात्रेसाठी लावण्यात आलेला कर या दोन उत्पन्नाच्या साधनाशिवाय दुसरे काहीही निर्वाहाचे साधन १३६ मध्ये तेल विहिरी सापडेपर्यंत  इथल्या लोकांकडे नव्हते. तेलाचा शोध लागल्यावर एक वेगळी अर्थव्यवस्था इथे उभी राहिली. पुढच्या लेखात या अर्थव्यवस्थेबाबत आणि त्याच्या इथल्या राजकारणाबाबत पाहणारच आहोत. तेलाचा शोध, तेलकंपन्यांचे इथे येणे आणि पुढचा राजकीय इतिहास यावर गिरीश कुबेरानी  दोन पुस्तके लिहिली आहेतच. तेलावर आधारित या अर्थव्यवस्थेत मोठमोठ्या तेल कंपन्या इथल्या जमिनीत तेल उत्खननाची व निर्मितीप्रक्रियेची परवानगी मिळावी म्हणून या राजवटीला प्रचंड पैसा देतात. खरेतर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अगदी नगण्य भाग या कंपन्या इथल्या राजेशाहीस देतात. परंतु इथली आधीची हलाखीची परिस्थिती पाहता हा पैसा इथल्या लोकांसाठी प्रचंड मोठा आणि तोही काहीही हातपाय न हलवता आलेला. तेलासाठी लागणारे तन्त्रज्ञान, उत्खनन व निर्मितीसाठी लागणारे भांडवल, व्यवस्थापन, निर्मित मालाची विक्री या कशातच इथल्या लोकांना श्रम नाहीत.  या येणाऱ्या पैशाचा विनियोग त्यांनी आपल्या राजेशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी केला. बाहेरच्या जगाशी या निमित्ताने या समाजाचा संबंध जरूर आला परंतु  बाहेर चाललेल्या कुठल्याच आर्थिक किंवा राजकीय प्रक्रियांमध्ये काही या देशांनी  प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही त्यामुळे सामाजिक दृष्ट्या परंपरागत व्यवस्था इथे चालू राहिल्या. आधुनिकीकरणाची प्रक्रिया व त्या अनुषंगाने होणारी घुसळण इथे घडतच नाही. मध्ययुगीन बेदुयीन टोळ्या ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम जगात तसेच आजही इथले लोक आपले व्यवहार करतात फरक एवढाच कि आज आर्थिक सुबत्ता इथे आहे जी पूर्वी नव्हती. इतर राष्ट्रांबरोबर यांचे संबंध आहेत पण त्यांना मिळणाऱ्या  बलाढ्य राष्ट्रांच्या संरक्षणामुळे इतर राष्ट्रांशी  स्पर्धा टिकून राहण्यासाठी किंवा आपले स्थान उंचावण्यासाठी या राष्ट्रांना करावी लागत नाही. १९३६ पासून आजतागायत या देशांच्या अर्थव्यवस्थेचा व त्यावर आधारित राजकारणाचा एक आकृतिबंध (pattern ) बनलेला आहे. 

दुसऱ्या  महायुद्धानानंतर सर्वच जगात वसाहतवादाविरुध्ह असंतोष वाढला त्यामुळे  त्याचेच दुसरे स्वरूप असलेला हा  संरक्षित क्षेत्राचा दर्जाही निकालात निघाला. ब्रिटन ने या सर्व देशांना स्वातंत्र्य दिले खरे पण यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन दोन्ही राष्ट्रांना फायदेशीर असे करार त्यानी केले. १८९९ पासून संरक्षित असलेला कुवेत १९६१ साली स्वतंत्र झाला. १८२० पासून ब्रिटीश अधिपत्याखाली असणारा बहारीन १९७१ साली स्वतंत्र झाला. ओमान तसा संरक्षित प्रदेश नव्हता पण त्याच अर्थाच्या अनेक करारानुसार ब्रिटीश त्याच्याशी संबंध ठेऊन होते आणि ते आजतागायत तसेच आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ब्रिटनच्या संरक्षणाच्या भूमिका स्वतःकडे घेतल्या आहेत. १८५३ पासून संयुक्त अरब अमिरातीने ब्रिटीश संरक्षित करार केला होता.  १९७१ मध्ये यु. ए. इ स्वतंत्र झाला. क़तार १९१६ पासून असाच ब्रिटीशांच्या अंकित होता तो १९७१ साली स्वतंत्र झाला. 

एकंदरीत ही सर्व राष्ट्रे गेल्या ४०-५० वर्षात स्वतन्त्र व स्वायत्त राष्ट्रे म्हणून आपला कारभार पाहू लागली आहेत. याआधी शेकडो वर्षे बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे हे देश आणि समाज इतर समाजापासून तुटलेले होते. गेल्या दीड शतकात बाहेरच्या जगाशी संबध येउन आणि आर्थिक सुबत्ता येऊनही इथे आधुनिक शासनव्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत. वर्षानुवर्षे चालत असलेल्या  टोळी समाजातल्या सत्ता आणि समाजव्यवस्थाच इथे अजून चालू राहिलेल्या दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्य तर मिळाले, सत्ता मिळाली आणि आर्थिक सुबत्ता ही आहे पण स्वतःची अशी ओळख या राज्यकर्त्यांना नाही. आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे सत्ता आहे पण  परंपरागत  अधिकार सोडला तर दुसरा काही बेस नाही , कुठल्याही आधुनिक शासन प्रशासन संस्था यांच्याकडे नाहीत अशी परिस्थिती या राजेशाहांची स्वातंत्र्योत्तर काळात होती. परंपरेवर आधारित स्वताची सत्ता टिकवायची असेल तर त्या परंपरा व त्यातील हितसंबंध जोपासणे या राज्यकर्त्यांना भाग आहे. सौदी अरेबिया हे त्या मानाने अगदीच नवीन राज्य आणि या राज्य निर्मितीच्या कामात वहाबी पंथाचा मोठा सहभाग त्यामुळे सौदी सत्तेचे अधिष्ठान वहाबी विचारसरणीवर आधारित इस्लामचे अनुकरण. कर्मठ, कट्टर, शुद्धीवादी  आणि xenophobic अशा इस्लामच्या एका विशिष्ट अनुवादावर आधरित धर्मसत्ता म्हणून सौदी आपली ओळख यानंतरच्या काळात प्रस्थापित करताना दिसतो. खरे तर हे कर्मठ धर्मावर आधारित असे रूप सौदीस संरक्षण देणाऱ्या ब्रिटन अमेरिकेच्या आधुनिक प्रतिमेपेक्षा खूपच विरोधाभासाचे वाटते. आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी एका बाजूला अद्ययावत तंत्रज्नानावर आधारित शहरे, सुविधा हे देश स्थापन करताना दिसतात पण त्याचबरोबर आपली धार्मिक सत्ता आणि तीच अस्मिता म्हणून मोठ मोठ्या मशिदी, इस्लामिक स्कॉलरशिप, धर्माचा प्रसार प्रचार यात ही राष्ट्रे आपली सर्व साधन सामुग्री पणाला लावताना दिसतात. 

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १८ वा.ऑटोमन व वासाहतिक काळातला अरब आणि सौदी इतिहास



ऑटोमन व वासाहतिक काळातला  अरब आणि सौदी इतिहास 

आजची अरब राष्ट्रे समजायची असतील तर या आधीचा ऑटोमन व वसाहतवादाचा इथला इतिहास समजून घेतला पाहिजे. ऑटोमन साम्राज्यात हेजाझ चा मार्ग आणि मक्का आणि मादिनाचे संरक्षण या दोन गोष्टी सोडल्या तर या खंडहरात त्यांना मुळीच स्वारस्य नव्हते. पश्चिमेकडचे  एडन आणि येमेन चा भाग आणि १९ व्या शतकात अल हझ्झा म्हणजे आजच्या कुवेतच्या दक्षिणेकडचा भाग असा ओतोमानांचा विस्तार होता. ब्रिटीशांनाही सामुद्रिक व्यापारासाठी इथल्या किनाऱ्यांवर आणि मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर  मालकी हवी होती. आखातातल्या आतल्या टोळी समाजात या दोन्ही साम्राज्यांना काहीही रस नव्हता. एक तर  दळणवळणाच्या सोयी अभावी हे भाग दुर्गम होते आणि तिथे वाळवंट आणि दारिद्र्य या शिवाय काहीही नव्हते.  भटक्या आपापसात भांडणाऱ्या या टोळ्या शेजारच्या सध्याच्या इरक़ व सिरीया इथल्या भूभागावर अनेकदा आक्रमणे करत. हा भाग तुलनेने शेतीप्रधान व समृध्द. ओतोमानांच्या ताब्यात असलेल्या या भागावरील आक्रमणे रोखणे आणि मक्का व मदिनेला होणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंचे संरक्षण आणि तिथली कर आकारणी या दोन गोष्टीसाठी ऑटोमन साम्राज्याची  इथे उपस्थिती. ऑटोमन  खलिफा हा मुस्लिम धर्मियांचा प्रमुख आणि त्या नात्याने तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र आणि तीर्थयात्री यांच्या देखभालीची आणि संरक्षणाची जबाबदारी परंपरेने खलीफाची असे.  अर्थातच इस्तंबूल मधून खलिफा किंवा त्याचे अधिकारी त्या काळात ही जबाबदारी प्रत्यक्ष निभवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी सीरियाच्या गव्हर्नरला ही करआकारणी, टोळधाडीपासून  शेजारच्या प्रांतांचे संरक्षण व मक्का मादिनेचे संरक्षण अशी जबाबदारी दिलेली. ऑटोमन साम्राज्यात जरी आखातातला काही भाग आला तरी इतर ठिकाणी झालेले बदल, सामाजिक राजकीय अभिसरण यापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत हा भाग अलिप्तच राहिला. ऑटोमन साम्राज्याची राज्य करण्याची पद्धतच तशी होतॆ. स्थानिक नेत्यांनी   खालीफाचे आणि खिलाफतीचे अधिपत्य मान्य करायचे, आवश्यक तो कर गोळा करून द्यायचा आणि स्थानिक कारभार मात्र त्यांचाच चाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनांच्या मदतीने बांधलेल्या बगदाद बानमुळे  ( Bahn - जर्मनमध्ये रेल्वे) पहिला मोठा बदल या भागात झाला. 

Inline image 1

तुर्कस्तानात इस्तंबूल पासून निघणारी ही रेल्वे लाईन बगदाद बसरा आणि दुसऱ्या बाजूला मादिन्यापर्यंत पोहचत होती. आतापर्यन्तची दुष्कर तीर्थयात्रा या रेल्वेमुळे अतिशय कमी वेळात व सुखपूर्वक होऊ लागली. ऑटोमन साम्राज्याचा विस्तार एडन आणि अल हज्जा ( दक्षिण कुवेत) पर्यंत वाढला. साहजिकच या रेल्वेमार्गाच्या देखभालीची जबाबदारी ऑटोमनांची झाली. याच वेळेस  हा मकका  येथील स्थानिक नेता व शेरीफ हुसेन  आपले सामर्थ्य या भागात वाढवू इच्छित होता. मक्का व मदिना ( हेजाझ प्रांत )  येथे त्याला मान्यता होतीच आणि त्याने ऑटोमन खलीफाचे  अधिपत्य मान्य केले होतेच.   हुसेन फार महत्वकांक्षी होता. संपूर्ण अरब प्रांताचा राजा होण्याचे त्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले नाही पण त्याच्या मुलांनी पुढच्या काळात  काय काय केले ते नंतर येईलच.  एडन बंदरात  या काळापर्यंत ब्रिटीशांनी आपला जम बसवला होता. भारतीय उपखंडातून येणारी जहाजे पुढे सुवेझ कालव्यामधून ब्रिटीश बेटांकडे येत जात होती. आणि या सर्वांचे नियंत्रण एडन बंदरातून होत होते. इथला आपला जम बसावा म्हणून किनाऱ्यालगतच्या टोळी प्रमुखांबरोबर ब्रिटीशांची या किनाऱ्यावर हुकुमतीसाठी हातमिळवणी सुरु झाली होतीच. पहिल्या महायुद्धआधीचा  हा कालखंड. ऑटोमन साम्राज्याविरुध्ह असलेला थोडा असंतोष, इथल्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या लालसेला खतपाणी घालून आता ब्रिटिशानी वाढवायला सुरुवात केली.   पीटर ओ'टूलचा लॉरेन्स ऑफ अरेबिया हा याच विद्रोहावर निघालेला लोकप्रिय सिनेमा. यात थोमस लॉरेन्स हा ब्रिटीश अधिकारी इथल्या स्थानिक अरबांना ऑटोमन साम्राज्याविरुद्धच्या उठावास मदत करतो. ब्रिटीश नजरेतूनच या सिनेमाची  निर्मीती झालेली असली तरी त्या वेळची परिस्थिती बऱ्यापैकी या सिनेमात चित्रित केली आहे.    
Inline image 1   

पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि विजेत्या राष्ट्रांत नवीन भूभागांची वाटणी सुरु झाली. पहिले महायुध्द संपायच्या आधीच इंग्लंड आणि फ्रांसने रशियाच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याची विभागणी आपापसात केली होती. बोल्शविक सत्तेवर येउन १९१८ साली त्यांनी हा कट  उघडकीस आणला तेव्हा ब्रिटन फ्रांसची नाचक्की झाली पण तो भाग अलहिदा. Sykes–Picot Agreement, किंवा Asia Minor Agreement या नावाने हा प्लान ओळखला जातो. यानुसार अरब प्रांत हा ब्रिटीश व फ्रेंचांच्या मध्ये व रशियाला लागून असलेला भाग रशियास असा विभागणीचा बेत होता आणि राहिलेला प्रदेश हा आंतरराष्ट्रीय प्रदेश म्हणून पुन्हा यांच्याच अख्त्यरॆत. खाली या विभाजनाचा नकाशा दिला आहे. 
Inline image 1

याप्रमाणे ब्रिटीश जॉर्डन नदीपासून जॉर्डन, दक्षिण इराक़ भूमध्य समुद्रालगताचा हैफा चा भाग जेणेकरून या समुद्र्मार्गावर त्यांचे आधिपत्य राहील. फ्रेन्चांकडे दक्षिण पूर्व तुर्कस्तान, उत्तर इराक़, सिरीया आणि लेबनॉनचा काही भाग तर रशियाकडे इस्तंबूल, तुर्कस्तानच्या दोन्ही सामुद्र्धुन्या आणि अर्मेनियाचा ऑटोमन साम्राज्यातला भाग अशी विभागणी होणार होती. शरीफ हुसेनला ही या बेतात सामील करून त्याला स्थानिक अधिकार हेजाज च्या प्रदेशाचे द्यायचे आणि या सर्व  भागांच्या सीमा निश्चित करायच्या असा हा बेत होता.  आणि इथेही अरबस्तानाच्या वाळवणटी भागात या कोणालाही स्वारस्य नव्हते. हा तेल मिळण्याआधीचा कालावधी.  पहिल्या महायुद्धानंतर या बेतानुसार वाटणी झाली नाही तरी ब्रिटीशांनी इथल्या किनाऱ्यावर जम बसवताना इथे भारतासारखी वसाहत निर्माण केली नाही कारण त्यांचे हितसंबंध फक्त समुद्रमार्गे दळणवळण एव्हढेच राहिले. इथल्या स्थानिक नेत्यांना शेखांना त्यांनी स्थानिक कारभारात स्वयंपूर्णता राखू दिली आणि त्यांच्याबरोबर फक्त संरक्षित प्रदेश protectorate असे करार केले. सध्याचा या भागाचा नकाशा पाहिला तर 
Inline image 2

सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा देश पण इतर छोटे देश १९व्या शतकापासूनच अस्तित्वात आहेत. तेव्हाच्या शेखशाह्या ( sheikhdom)  आणि  आताचे हे स्वतंत्र देश.  महायुद्धानंतरच्या  mandate system चा भाग. या Mandate System ने त्यांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली . या system बद्दल आपण इराक़ सिरीया बद्दलच्या लेखात सविस्तर विचार करूयात. थोडक्यात नवा गडी  पण पुराना राज्य चालू राहिले ऑटोमनांची जागा ब्रिटीशांनी घेतली. बाह्य आक्रमणापासून संरक्षण आणि त्याबदल्यात समुद्र किनाऱ्याचा वापर असा हा सौदा होता. अंतर्गत राज्य व समाजरचना टोळीप्रधानच राहिली. ओमान मध्ये ब्रिटीशांची उपस्थिती (पPresence ) मर्यादित होता पण इतर ठिकाणी त्यांनी या Protectorate व्यवस्थेला एक औपचारिक रूप दिले होते. त्यानुसार या प्रदेशांचे सर्व परदेशी व्यवहार ब्रिटीश पाहणार म्हणजेच त्यांचे अस्तित्व एका अर्थाने ब्रिटीशांच्या अंकीतच होते. 


काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १७ वा.सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रे



सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रे 

सौदी अरेबिया, एका बाजूने प्रचंड समृद्धी, विकास आणि अद्ययावत सोइ  सुविधांनी सज्ज अशी शहरे पण त्याचबरोबर परंपरागत अरब समाज असे परस्परविरोधी चित्र समोर येते. परिस्थिती आहेही तशीच - पाश्चात्य देशातील सुखवस्तूनची मोठी बाजारपेठ आणि त्याचबरोबर परंपरेने चालत आलेला प्रगैताहासिक चाली रीतींवर आधारित समाजसंघटन. अद्ययावत संसाधने आणि बक्कळ समृद्धी पण त्याचबरोबर सामाजिक बदलात अगदीच मागे असा नव्या जुन्याचा संगम असलेला हा प्रदेश. ओमान आणि येमेन हे तुलनेने कमी संपन्न  देश वगळता सर्वच देशांत हा विरोधाभास दिसून येतो. पाश्चात्य देशांतील उपभोग्य वस्तूंबरोबरच अद्ययावत शस्त्रास्त्रे, सर्व प्रकारचे विलास आणि ऐश आरामाची साधने, कार्यक्रम उदा फॉर्म्युला वन, उंटाच्या शर्यती, महागडे व्यापार प्रदर्शने इत्यादी इथे भरताना दिसतात. परंतु अंतर्गत समाजरचना आणि प्रथा, रिवाज हे अजूनही शेकडो वर्षे जुन्या अशा विचित्र द्वंद्वात हा समाज जगताना दिसतो. या विसंगत वागण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे उत्तुंग इमारती आणि झगमगाटीत उभ्या असलेल्या शहरातील महिला मात्र बुरख्याच्या आत आणि त्यांना सर्वाजनिक जीवनाची सर्व दारे बंद! नोकरीधंद्यात नगण्य असे त्यांचे प्रमाण, एकटीने संचार स्वातंत्र्य नाही, ड्रायव्हिंगची, खेळात भाग घेण्याची परवानगी नाही, एकूणच स्वतंत्र असे अस्तित्व या महिलांना नाही. आधुनिक, पाश्चिमात्य देशांचे अनेक बाबतीत अनुकरण करणारे हे देश जुन्या टोळीच्या  समाज संरचनेस अगदी घट्ट धरून बसताना दिसतात. इथे धर्म आणि टोळींचा रिवाज असा फरक करण्याची गरज आहे. स्त्रियांचे एकूण समाजातील स्थान, त्यांनी कसे वागावे, राहावे याबाबतीतले नियम हे मुख्यतः अरबस्तानातल्या टोळी समाजाचे नियम परंतु ते धार्मिक नियम म्हणून इथून प्रसारित होताना दिसतात आणि इतर समाजावर लादलेले दिसतात. उदा मुस्लिम स्त्रिया वापरत असलेला  काळा बुरखा हा खरे तर इथल्या खालिजी  टोळीतील स्त्रियांचा परिवेश परंतु आज जगात - शिया धर्मीय सोडता हाच मुस्लिम स्त्रियांचा वेश आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान अशी गल्लत दिसते. महाराष्ट्रातील अगदी छोट्या खेड्यापाड्यात हे लोन पोहचलेले आहे. काही दशकांपूर्वी इथे आणि उत्तर भारताचा अपवाद सोडता  प्रचलित असलेली साडी आता कमी दिसू लागली आहे. हाच बदल पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये झालाच पण आज पाश्चिमात्य देशांमध्येही मुस्लिम स्त्रिया स्वतःची वेगळी अस्मिता दाखवण्यासाठी हा परिवेश अट्टाहासाने धारण करताना दिसतात.  त्यांच्या व्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून आज इतरांनी त्याला स्वीकृती दिलेली दिसते आणि असेलही तो व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक - कोणी काय घालावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि सोयीचा भाग - स्वातंत्र्यपूर्व काळात नववारी सोडून कुर्ता पायजमा घालता यावा यासाठी तेव्हा घराघरात वाद झालेच होते किंवा माझ्या पिढीला जीन्स घालता यावी म्हणून वाद झाले होते -- आजच्या तरुणांना यात वाद काय घालायचा इतपत जीन्स आता सर्वमान्य झालीच आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट धर्माचा भाग म्हणून स्वीकारली जाते आणि लाद्लीही जाते तेव्हा ती नक्कीच आक्षेपार्ह असणारी गोष्ट. मुद्दा हा कि धर्म आणि संस्कृती आणि मुस्लिमांच्या संदर्भात  इस्लाम आणि अरबांची टोळी संस्कृती यात फरक केला जात नाही, परिणामी जे या अरब देशांत घडते त्याला धार्मिक मान्यता म्हणून सर्व मुस्लिम जगात ते स्वीकारले  जाते. 

 या सर्वमान्यातेचे कारण म्हणजे इस्लामी जगतात सौदीस  अनन्यसाधारण  असे महत्व आहे -   भोगोलिक आणि आध्यात्मिक इस्लामच्या केंद्रस्थानी हा देश  आहे. इस्लामची पवित्र तीर्थक्षेत्रे मक्का आणि मदिना इथेच आहेत. इथूनच प्रेषिताने धर्मप्रसार सुरु केला होता. मुस्लिम धर्मीयांना पवित्र असलेला काबा सौदीमध्ये आहे. प्रेषिताने इथून धर्मप्रसार सुरु केला आणि त्याचबरोबर काब्याच्या २० मैल परिसरात रक्तपात आणि हिंसेला बंदी केली. त्याकाळी आपापसात झगडणाऱ्या टोळ्यांमध्ये एकी निर्माण व्हावी हाच प्रेषिताचा हेतू होता. प्रेषित कालपासूनच काबा मुस्लिमांचे तीर्थक्षेत्र असून दर वर्षी तिथे करोडोच्या संख्येने मुस्लिम जमतात. इस्लामच्या पाच मुलभूत कर्तव्यापैकी एक म्हणजे हाज - काब्याची तीर्थयात्रा. या करोडो लोकांच्या तीर्थयात्रेची सोय आणि काब्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टींची जबाबदारी सौदीच्या शासकांकडेच आहे. सौदी राजाचा उल्लेख काब्याचा रक्षक, पालक असा केला जातो. मक्का आणि काब्यालाजाणारे मार्ग तीर्थ यात्रेकरूंसाठी सुरक्षित राखण्याची जबाबदारी त्या त्या प्रदेशातील राजवटींची होती आणि या मार्गावर मिळणारा महसूल ही बर्यापैकी मोठा होता. जे जे इथे घडते ते ते सर्व मुस्लिम जगतात आदरणीय आणि अनुकरणीय समजले जाते.  परंतु सौदी आणि इतर मुस्लिम जगतातल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कमालीचे अंतर आहे. सौदी आणि इतर गल्फ देश त्यांच्या स्त्रियांना पूर्णपणे बुरख्यात ठेवून, सार्वजनिक आणि आर्थिक जबाबदार्यांपासून दूर ठेऊ शकतात कारण त्यांना ते परवडणारे आहे. इतर ठिकाणी उदा अफगाणिस्तान जिथे तलिबाननी हेच निकष स्त्रियांच्या दिसण्यास त्यांच्या समाजात वावरास लावले आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम स्त्रिया, मुले आणि एकूणच समाजावर झाला. अफगाणिस्तानवरच्या लेखात याचे सखोल विश्लेषण येईलच. देशाच्या अर्ध्या आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा घटकास अशा प्रकारे घरी बसवून ठेवणे हे पाकिस्तान, बांगलादेश व आफ्रिकेतील गरीब देशांना मुळातच न परवडणारी गोष्ट. पण इस्लामच्या या आखाती देशातून आयात केलेल्या प्रतिमांमध्ये आपल्याला बसवण्याचा आटोकाट प्रयत्न हे समाज करताना दिसतात. हा प्रश्न मागासलेल्या  समाजानी केलेले अनुकरण एव्हडाच नसून  मलेशिया आणि पाश्चात्य देशातील अनेक सुशिक्षित आणि स्वतंत्र स्त्रिया ही, स्त्रियांच्या वेशभूषेचे आणि वागण्याचे हे अरबी रूप स्वीकारताना दिसतात. याचे कारण तेलाच्या पैशावर चालणारे इस्लामीकरणाचे प्रकल्प  आणि त्यावर सौदीची आणि पर्यायाने वहाबी पंथाची घट्ट पकड होय. 

सौदी आणि एकूणच आखातातला हा समाज हा टोळीप्रधान तर आहेच पण त्याचबरोबर पितृसत्ताक आणि पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या कुळ आणि वंशावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता ही आहे. 
या समाज रचनेत टोळीप्रमुख आणि इतर यांच्यात एक प्रकारचे संरक्षक/ पालक - संरक्षित अशा श्रेणी आहेत. सर्व सत्ता एका किंवा टोळीमधल्या मुख्य पुरुषांच्या हाती असते. संरक्षणाच्या बदल्यात यांनी स्थापन केलेले रितीरिवाज सगळ्यांनी पाळावेत अशी ही व्यवस्था. हीच व्यवस्था शासनपातळीवरही दिसून येते. तेल विकून आलेल्या पैशावर वेगळ्या प्रकारचे कल्याणकारी राज्य इथे उभे आहे. यात जोपर्यंत तुम्ही शासकांच्या अंकित राहून त्यांच्या नियम रिवाजानुसार राहता तोपर्यंत तुम्हाला संरक्षण, या व्यवस्थेबद्दल बोलायचाही अधिकार या नागरिकांना नाही. समाजशास्त्रात यालाच अरब सामाजिक करार ( Arab Social Contract ) असे नाव आहे. या शासनव्यवस्थेत राजाला सर्व अधिकार - संपत्ती जमा  करण्याचे आणि उपभोगण्याचे ही. त्याबदल्यात लोकांच्या आर्थिक गरजा त्यांनी भाग्वाव्यात, लोकांनी या शासकाच्या नियमांचे पालन करावे, प्रश्न विचारू नयेत किंवा कुठल्याही प्रकारच्या राजकीय प्रक्रियेत सामील होऊ नये. पिढ्या नु पिढ्या चाललेल्या या उतरंडीच्या रचनेत सगळ्यांच्या जागा आणि भूमिका अगदी ठरलेल्या! अर्थातच ही व्यवस्था फक्त अरब राष्ट्रातच नाही तर मध्य युगीन युरोप आणि सद्य कालीन अनेक आफ्रिकन देशात दिसून येते. जिथे जिथे अशा सरंजामी व्यवस्थेचा आर्थिक पाया डळमळू लागतो तिथे तिथे या रचनांना आव्हाने मिळताना दिसतात. अरब राष्ट्रांत मात्र  हे होताना दिसत नाही . परंपरेने चालत आलेली घडी आता तेल  आणि ग्यासवर आधारित नव्या अर्थव्यवस्थेत  आणखीनच पुष्ट होताना दिसते. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था या भाडेतत्वावर चालणार्या आहेत. मोठमोठ्या विदेशी कंपन्या या तेल आणि ग्यास  काढण्याचे, विकण्याचे काम करून प्रचंड नफा कमावतात. त्या नफ्यातला नगण्य भाग या देशात्तेल शासकांना दिला जातो. या देशातील जवळजवळ ४०% च्या वर उत्पन्न हे या भाड्याच्या मार्गाने मिळते आणि यात इथल्या जनतेला काहीही शर्म करावे लागत नाहीत. एका अर्थाने घरी बसून त्यांना हे आयते उत्पन्न मिळते आणि याच उत्पन्नाच्या जोरावर त्यांच्या परंपरागत समाजव्यवस्था चालू आहेत. या समाज व्यवस्थेचे आणि धर्माचे तसे काही देणे घेणे नाही. या सर्व देशांच्या आर्थिक बाबी या खरे तर त्यांच्या धर्मातील तरतुदींपेक्षा जास्त प्रमाणात समाजाचे विशिष्ट संघटन करताना दिसतात. या देशांतील लोक ज्या पद्धतीने राहतात, व्यवहार करतात आणि ते तसे करू शकतात कारण त्यांना मिळणारा हा पैसा, न की त्यांचा धर्म. पण याच सामाज्व्याव्स्थेस इतर मुस्लिम समाज मात्र धार्मिक अधिष्ठान देऊन प्रमाण मानतो, असे हे विचित्र त्रांगडे होऊन बसले आहे. 

पहिल्या लेखात आपण आधुनिकतेला प्रतिसाद देणारे चार नमुने पाहिले - अनुकरण, अंतर्गत सुधारणा, मुलतत्ववादी विचार आणि आधुनिकतेच्या तत्वांना नाकारून पारंपारिक व्यवस्थांचा पुरस्कार. सौदी आणि इतर आखातातले देश हे चौथ्या प्रकारात मोडतात. आम्हाला आमच्या समाज रचना, शासन व्यवस्था बदलायची मुळीच गरज नाही. ज्या व्यवस्था आहेत त्या अगदीच सुयोग्य आहेत असे यांचे म्हणणे. पण याच संदर्भात आपण केनिथ वाल्ट्झ यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या  सिद्धांताची चर्चा केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर देश , समाज एकमेकांशी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यात सामाजीकरणाची, अभिसरणाची आणि त्यातून बदलाची प्रक्रिया होतेच होते असे केनिथ वाल्ट्झ म्हणतात.  आजच्या स्पर्धात्मक वातावरणात कुठल्याही देशाला टिकायचे असेल तर त्याला इतर देशांमध्ये जे बदल घडत आहेत ते स्वीकारावेच लागणार अन्यथा अशी राष्ट्रे व समाज हा नामशेष होईल असे वाल्त्झ्चे म्हणणे आहे. अरेबियन देशांकडे बघता त्यांनी काही बाबतीत हे अनुकरणाचे, स्पर्धेत राहण्यासाठी आवश्यक असे बदल केलेले दिसून येतात उदा अद्ययावत शस्त्रास्त्रे, तन्त्रज्ञान, उद्योग आणि शहरीकरण. परंतु विरोधाभास हा कि सामाजिक मुल्ये आणि समाजरचना मात्र मध्य युगीन ठेवण्यात, त्या न बदलता चालू राहिल्या आहेत. हे असे का झाले याचा विचार करता पहिली गोष्ट लक्षात येते ती अशी कि एकोणीसाव्या शतकापर्यंत हे देश तसे एकाकी आणि अत्यंत दुर्गम होते. अतिशय मागास आणि दरिद्री असा हा प्रदेश, यात कोणालाच स्वारस्य नव्हते. त्यामुळे इथला समाज जगातील बाकी घडामोडींपासून अलिप्तच राहिला. तुर्कस्तान किंवा इजिप्तमध्ये जे विचार, घडामोडी झाल्या त्या इथे होऊ शकल्या नाहीत कारण इथल्या दुर्गम वाळवन्टात ओटोमान किंवा युरोपीय वासाहात्वाद्यान काहीच मिळणार नव्हते. ओतोमानांची नाममात्र सत्ता इथे होति. अंतर्गत सारे व्यवहार त्यांनी इथल्या स्थानिक टोळ्यांवर सोपवले होते. विसाव्या शतकात समुद्र मार्गावर अधिपत्य गाजवण्याहेतू इथल्या किनारपट्टीत ब्रिटीशांना रुची निर्माण झाली व त्यांनी त्या बदल्यात या भूभागाला संरक्षण दिले. तेलाच्या विहिरींचा शोध लागेपर्यंत इथल्या वाळवन्टाशी कोणाचे घेणेदेणे नव्हते. विसाव्या शतकात ही परिस्थिती बदलली आणि सर्वच महासत्तांना तेलासाठी इथे येण्याचे प्रलोभान मिळाले. या महासत्तांनी रेड लाईन आखून या भूभागाची आपपसात वाटणी केली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. या देशांना उत्पन्न, संरक्षण , तंत्र्ज्नान आणि दळणवळणाची साधने अशी घर बसल्या विकसित झाली कारण तेलाच्या उत्खननासाठी आणि व्यापारासाठी उद्योजक आणि नोकरवर्गाची ती गरज होती. वाल्ट्झचा सिद्धांतानुसार छोटी राष्ट्रे आणि समाज या स्पर्धात्मक वातावरणात टिकणे अवघड असते.विशेषतः छोट्या परंतु नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न अशा देशांना शेजारची मोठी राष्ट्रे गिळंकृत करण्यास टपलेली असतातच. कुवेतच्या बाबतीत हेच झाले. इराकने तेल विहिरींसाठी कुवेतवर हल्ला केला पण त्याच वेळेस अमेरिका कुवेतच्या सहाय्यास धावून आली. कुवेतला स्वतःचा बचाव करण्यासाठी आधुनिक सैन्याची गरज नव्हती. ऑपरेशन डेजर्त स्टोर्म मध्ये विदेशी देशांच्या सहाय्याने आणि त्यांच्याच साधनसामुग्रीने  कुवेतवरचा हा हल्ला परतवला होता. या लढाईत सौदीचा सहभाग नाममात्र होता. सौदी कडे अद्ययावत सामग्री असली तरी ती वापरण्याचे कौशल्य, प्रशिक्षण नव्हते व आजही नाही. या देशांची ही परावलंबी मानसिकता समजून घेण्यासाठी या भागाचा इतिहास समजावून घ्यावा लागेल.

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...